‘माती सांगे कुंभाराला’ आणि ‘रात्र काळी घागर काळी’ यांसारख्या गाण्यांमुळे गोविंदराव पोवळे घराघरांत पोहोचले होते. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि भावपूर्ण गायकीमुळे त्यांनी रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं.
पनवेलजवळील चिरनेर गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबातच संगीताचं वातावरण होतं. वडील कीर्तनकार होते, तर आईलाही संगीताची आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले.
अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी आकाशवाणीसाठी ऑडिशन दिलं आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली. त्या काळात सुगम संगीत गाणारे सर्वात तरुण गायक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. १९४८ मध्ये त्यांचं पहिलं गाणं थेट प्रसारित झालं आणि तिथून त्यांच्या संगीत प्रवासाला खरी सुरुवात झाली.
गोविंदराव पोवळे यांनी अनेक लोकप्रिय गाण्यांना संगीत दिलं. ‘उमटली रामाची पाऊले’, ‘पैंजण हरीचे वाजती’, ‘शुभंकरोती कल्याणम’ आणि ‘कामधाम संसार विसरुनी’ यांसारखी गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.
त्यांनी केवळ गायनच नाही तर अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शनही केलं. १९५७ मध्ये त्यांनी गिरगावमध्ये सुगम संगीताचे वर्ग सुरू केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कलाकार घडले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
