Samay Raina Indias Got Latent: कॉमेडियन समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने समय रैनासह आणखी चार विनोदवीरांवर प्रत्येकी 3 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड दोन आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
समय रैनासोबत विपुल गोयल, बलराज परमजीत सिंह घई, सोनाली ठक्कर आणि निशांत तंवर यांच्यावरही ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. आदेशानुसार, ठरलेल्या मुदतीत दंड न भरल्यास दंडाची रक्कम वाढवली जाऊ शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.
हे प्रकरण ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाशी संबंधित आहे. एसएमए इंडिया फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेत, या कार्यक्रमात मणक्याच्या गंभीर आजाराची आणि त्या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2025 मध्ये संबंधित विनोदवीरांना काही अटी घालून दिल्या होत्या. त्यानुसार, त्यांनी दर महिन्याला दोन शो आयोजित करून त्यातून दिव्यांगांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करावी. तसेच दिव्यांग व्यक्तींनाही या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते.
मात्र, या आदेशाचे पालन झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता समय रैना आणि इतर चार विनोदवीरांना न्यायालयाने ठोठावलेला दंड भरावा लागणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
