अक्षया गुरवने 2017 मध्ये भूषण वाणीसोबत लग्न केलं होतं. मात्र, काही वर्षांनंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयाने या विषयावर पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं.
आपल्या घटस्फोटाबाबत बोलताना अक्षयाने सांगितलं की, तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला तिला हे सगळं आवडलं नव्हतं. मात्र, लोकांनी जे वाचलं आहे ते खरं असल्याचं तिने स्पष्ट केलं.
विशेष म्हणजे, घटस्फोटानंतरही अक्षया आणि भूषण यांच्यात कटुता नाही. ‘आम्ही दोघे आजही चांगले मित्र आहोत’, असं अक्षयाने सांगितलं. दोघेही एकाच क्षेत्रात काम करत असल्यामुळे भविष्यात एकत्र काम करण्याची संधी मिळाली तर त्याला आपण तयार असल्याचंही तिने म्हटलं.
प्रेम आणि नात्यांबाबतही अक्षयाने आपलं मत मांडलं. तिच्या मते, प्रेमात नेहमी नि:स्वार्थी असणं महत्त्वाचं आहे. समोरच्या व्यक्तीला आयुष्यातून दूर जायचं असेल तर तिला जबरदस्तीने थांबवण्यात अर्थ नसतो, असं ती म्हणाली. हे केवळ नवरा-बायकोच्या नात्यालाच नाही, तर मैत्री आणि कुटुंबातील नात्यांनाही लागू होतं, असं तिचं मत आहे.
घटस्फोटानंतर पुन्हा आयुष्यात नवीन नात्याला संधी देण्याबाबतही अक्षया सकारात्मक आहे. ‘मला पुन्हा संसार करायचा आहे’, असं तिने स्पष्टपणे सांगितलं. एखादं नातं बिघडलं म्हणून पुढचं नातंही तसंच होईल, असं नसतं, असं तिचं म्हणणं आहे.
अक्षयाने लग्नसंस्थेवरील आपला विश्वासही कायम असल्याचं सांगितलं. भविष्यात आयुष्यात अशी व्यक्ती असावी, जिच्यासोबत मनातल्या सगळ्या गोष्टी मोकळेपणाने बोलता येतील, अशी तिची इच्छा आहे. तसंच ‘मला एक मुलगी हवी आहे’ असंही तिने मुलाखतीत सांगितलं.
आयुष्यात घडलेल्या एका अनुभवामुळे संपूर्ण आयुष्याकडे नकारात्मक नजरेने पाहण्याची गरज नाही, असं अक्षया मानते. त्यामुळे घटस्फोटानंतरही ती आपल्या भविष्यासाठी सकारात्मक आहे.
अक्षया गुरवच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. अभिनयाच्या कामासोबतच आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा तिचा प्रयत्नही या मुलाखतीतून समोर आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
