Divya Shinde: ‘बिग बॉस मराठी ६’ मधून बाहेर पडल्यावर दिव्या शिंदेने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिने तलवारीच्या वक्तव्यावर आणि शोमधील अनुभवांवर सविस्तर बोलणं केलं.
दिव्याला शोमधून बाहेर काढण्याचं कारण ठरलं तिचं एक विधान. ती म्हणाली होती की बाहेर गेल्यावर ती तलवार चालवेल. बिग बॉसने तिला माफी मागण्याची संधी दिली होती, पण तिने नकार दिला. यानंतर तिला घराबाहेर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
पत्रकार परिषदेत दिव्या म्हणाली, “तलवार ही माझ्यासाठी शाब्दिक आणि वैचारिक आहे.” तिच्या मते, ती कुठल्याही प्रकारची हिंसा सुचवत नव्हती. “संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन फिरणार नाही. पण तरीही मला जबरदस्तीने चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं,” असं ती म्हणाली.
दिव्याने बिग बॉसच्या टीमवर गंभीर आरोप केले. ती म्हणाली की शोमध्ये येण्याआधीच तिने तिच्या आरोग्याबाबत स्पष्ट माहिती दिली होती. “मी त्यांना सांगितलं होतं की माझी तब्येत नेहमी ठीक नसते आणि मला आरामाची गरज लागते. त्यांनी काळजी घेण्याचं आश्वासन दिलं होतं,” असं ती म्हणाली.
पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही, असा तिचा आरोप आहे. दिव्या म्हणाली की घरात असताना तिचा ऑक्सिजन लेव्हल कमी होत होता आणि ती वेदनेत होती. “मला आवश्यक इंजेक्शन मिळायला दोन दिवस लागले. त्या काळात मी मरणाच्या दारात होते,” असं ती म्हणाली.
दिव्याने शोच्या एडिटिंगवरही प्रश्न उपस्थित केले. तिच्या मते, तिला मुद्दाम व्हिलन दाखवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रसंग कट करण्यात आले. “मी स्वतः कन्फेशन रूममध्ये जाऊन सांगितलं होतं की मला शो सोडायचा आहे. पण ते फुटेज कधीच दाखवलं नाही,” असं ती म्हणाली.
तलवारीच्या विधानाबाबत दिव्याने सांगितलं की तिला ‘शब्दांची तलवार’ असा उल्लेख करण्याचा सल्ला देण्यात आला होता. “माझ्या मनात तेच होतं. पण बिग बॉसने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू दिलं नाही,” असं ती म्हणाली.
तिने हेही सांगितलं की काही स्पर्धकांनी तिची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या चर्चांचे फुटेज दाखवण्यात आले नाही. शेवटी केवळ धमकीचा ठपका ठेवून तिला बाहेर काढण्यात आलं, असा तिचा दावा आहे.
दिव्याने आधी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते आणि “विषय संपला नाही, तर सुरु झालाय” असं म्हटलं होतं. आता तिच्या या आरोपांनंतर पुढे ती काय पावलं उचलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
