Yed Lagla Premacha Serial: स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत लवकरच एक वेगळा ट्विस्ट दिसणार आहे. यावेळी मालिकेत नवीन कलाकार नव्हे, तर बिबट्या दाखवला जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हा सामाजिक मुद्दा समोर ठेवत मालिकेतून जनजागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसतं. अनेकांनी जीव गमावला आहे, त्यामुळे हा विषय गंभीर झाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने याआधीही सामाजिक मुद्यांना हात घातले आहेत. त्याच परंपरेनुसार, या वेळी बिबट्यांचा वाढता वावर, त्याचा गावकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यावर होणारा परिणाम आणि सुरक्षेच्या काळज्या यावर मालिकेतून प्रकाश टाकला जाणार आहे.
सध्या मालिकेत राया आणि मंजिरीच्या लग्नाची तयारी सुरू आहे. पण मेंदीच्या कार्यक्रमादरम्यान बिबट्या दिसल्याने गावात गोंधळ उडणार आहे. राया आणि मंजिरीनं आधीही अनेक अडचणींना सामोरं जाऊन एकमेकांची साथ दिली आहे. आता बिबट्याच्या रूपात आलेलं हे नवं संकट ते कसं पार करतात, हे पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहे.
या ट्रॅकबद्दल बोलताना विशाल म्हणतो, महाराष्ट्रात झालेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकांनी प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत घाबरण्याऐवजी कोणत्या खबरदाऱ्या घ्यायला हव्यात, यावर मालिकेतून माहिती दिली जाणार आहे. बिबट्या दिसल्यास वनविभागाला तात्काळ कळवणं, रात्रीच्या वेळेस एकटं न फिरणं, घराबाहेर पुरेशी लाईट ठेवणं आणि मुलांना एकटं न सोडणं — अशा महत्त्वाच्या गोष्टी दाखवल्या जातील. विशालच्या मते, हा प्रसंग साकारणं ही मोठी जबाबदारी आहे.
मंजिरीची भूमिका करणारी पूजा बिरारी म्हणते, बिबट्यांच्या हल्ल्यांमधील वाढ आणि त्यामागची कारणं हे संवेदनशील विषय आहेत. मानवी वस्तीत बिबट्यांचा वाढता वावर हा खरोखरच चिंतेचा मुद्दा आहे. ही भीती आणि वास्तववादी परिस्थिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
