विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी ‘ईठा’ या शीर्षकावर आक्षेप घेत चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतही प्रश्न निर्माण झाले होते.
आता विठाबाईंचे नातू मोहित नारायणगावकर यांनी या वादावर प्रतिक्रिया देत कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या नावामागील कारण समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या.
मोहित यांनी सांगितले की, सुरुवातीला कुटुंबीयांना चित्रपटाचे नाव ‘विठाबाई नारायणगावकर’ असे असावे, असे वाटत होते. मात्र निर्मात्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात आजही अनेकजण विठाबाईंना ‘ईठा’ या नावाने ओळखतात, त्यामुळे हेच शीर्षक योग्य असल्याचे स्पष्ट केले. हे स्पष्टीकरण पटल्यानंतर कुटुंबीयांचे समाधान झाले.
त्यांनी पुढे सांगितले की, चित्रपटातून ग्रामीण महाराष्ट्र, तमाशा परंपरा आणि मराठी संस्कृती प्रामाणिकपणे मांडण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे चित्रपटाबद्दल कुटुंबीय समाधानी असून प्रेक्षकही या चित्रपटाचे स्वागत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोहित नारायणगावकर यांनी चित्रपटाचे कौतुक करत हा चित्रपट अतिशय सुंदर बनल्याचे सांगितले. तसेच तमाशा परंपरेचा वारसा पडद्यावर प्रभावीपणे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी श्रद्धा कपूर आणि चित्रपटातील इतर कलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ गावी नारायणगाव येथे भेट देणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
