Suyash Tilak Accident: ‘का रे दुरावा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता सुयश टिळक अलीकडे सोशल मीडियावर सतत त्याच्या प्रवासाच्या आणि खास क्षणांच्या पोस्ट शेअर करताना दिसतो. पण त्याने नुकतीच टाकलेली एक पोस्ट मात्र चाहत्यांना धक्का देणारी ठरली. प्रवासादरम्यान त्याच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडीचं मोठं नुकसान झालं.
सुदैवाने सुयशला काहीही दुखापत झाली नाही. पण गाडी महामार्गावरच बंद पडली. मदतीसाठी आसपास कोणीही नव्हतं. शेवटी जवळपास तासभर वाट पाहिल्यानंतर टोइंग व्हॅन आली आणि त्याला घरी परत घेऊन गेली.
आपला अनुभव शेअर करताना सुयश म्हणाला, “गाडी न चालवता आयुष्यातला सर्वात लांबचा प्रवास केला. छोटा अपघात झाला, पण माझ्या गाडीचं खूप नुकसान झालं. मला किंवा इतरांना काहीही इजा झाली नाही, याबद्दल मी आभारी आहे. पण जिथे हे घडलं तिथे कोणतीही मदत मिळाली नाही.”
तो पुढे लिहितो, “टोइंग व्हॅन आल्यानंतर मी शांतपणे गाडीतच बसलो. एसी नव्हता, पण जवळपास ६ ते ७ तास महामार्गावरून प्रवास केला. लोक कुतूहलाने पाहत होते, काही हसत होते, तर काही विचार करत होते की नेमकं काय झालं असेल.”
या प्रसंगातून त्याने सकारात्मक दृष्टिकोन घेतला. “रागवून किंवा चिडून काही बदलत नाही. प्रवासात पुस्तक वाचलं, गाणी ऐकली, झोप घेतली. आयुष्य कधी कधी असंच पुढे नेतं. आता हा प्रवास रागाने करायचा की खिडकी उघडून मोकळा श्वास घेत करायचा, हा निर्णय आपलाच असतो,” असं सुयशने सांगितलं.
सुयशच्या या पोस्टवर श्रुतकीर्ती सावंत, सुकन्या मोने, अनुपम ठोंबरे, उदय टिकेकर, शिल्पा तुळसकर यांसारख्या कलाकारांसह चाहत्यांनीही त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
