Akshaye Khanna: अजय देवगणचा बहुचर्चित चित्रपट ‘दृश्यम ३’ जाहीर झाल्यापासून सतत चर्चेत आहे. चित्रपटाच्या कास्टिंगवरूनही अनेक चर्चा रंगल्या. यातच अक्षय खन्नाने सिनेमा सोडल्याच्या अफवा पसरल्या होत्या. आता या सगळ्या चर्चांवर चित्रपटाचे निर्माते कुमार मंगत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
कुमार मंगत यांनी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय खन्ना ‘दृश्यम ३’मधून बाहेर का पडला, याचं कारण सांगितलं. इतकंच नाही तर अक्षयविरोधात कायदेशीर पावलं उचलण्याचाही विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, अक्षय खन्नासोबत करार आणि मानधन दोन्ही ठरले होते. मात्र, अक्षयने चित्रपटासाठी विग घालण्याची अट ठेवली. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी ही मागणी नाकारली. ‘दृश्यम’ हा सिक्वेल असल्याने लूकमध्ये बदल केल्यास कथेत विसंगती येईल, असं त्यांनी सांगितलं. सुरुवातीला अक्षयने ही भूमिका मान्य केली होती.
पण नंतर त्याच्या जवळच्या काही लोकांनी पुन्हा विग घालण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अक्षयने पुन्हा तीच मागणी मांडली. दिग्दर्शक चर्चेसाठी तयार होते. मात्र, काही दिवसांनी अक्षयने थेट चित्रपटात काम न करण्याचा निर्णय कळवला, असं कुमार मंगत यांनी सांगितलं.
कुमार मंगत यांनी अक्षयच्या वागणुकीवरही नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की, ‘सेक्शन ३७५’च्या काळात अक्षयकडे फारसं काम नव्हतं. त्या चित्रपटामुळेच त्याला ओळख मिळाली. त्यानंतरच त्याला **‘दृश्यम २’**सारखी मोठी संधी मिळाली. त्या आधी तो अनेक वर्षे घरी बसून होता, असंही त्यांनी नमूद केलं.
निर्मात्यांनी पुढे ‘धुरंधर’ चित्रपटावरूनही वक्तव्य केलं. त्यांच्या मते, ‘धुरंधर’ हा रणवीर सिंगचा चित्रपट आहे, अक्षय खन्नामुळे तो चालला असं म्हणणं चुकीचं आहे. “अक्षयने एकट्याने चित्रपट केला असता, तर तो ५० कोटींची कमाईही करू शकला नसता,” असा थेट आरोप त्यांनी केला.
काही कलाकार मल्टीस्टारर चित्रपट हिट झाले की स्वतःला सुपरस्टार समजायला लागतात. अक्षयसोबतही हेच घडलं आहे. यश त्याच्या डोक्यात गेलं आहे, असं म्हणत कुमार मंगत यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
