दोन्ही कलाकारांनी यापूर्वी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ‘बंधू’मध्ये ते भावांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्यांच्या सहज आणि वास्तववादी अभिनयामुळे या नात्याची कथा अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.
चित्रपटाच्या कथेत दोन भावांचं आयुष्य, त्यांच्यातील जिव्हाळा आणि परिस्थितीमुळे निर्माण होणारे मतभेद यांचा वेध घेतला जाणार आहे. भावाच्या सुखासाठी स्वतःचा त्याग करणारा एक भाऊ, नात्यातील विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि कठीण प्रसंगी घेतले जाणारे निर्णय हे कथेत महत्त्वाचे ठरणार आहेत.
ही कथा एका छोट्या गावाच्या पार्श्वभूमीवर घडते. त्यामुळे चित्रपटातील प्रसंग ग्रामीण जीवनाशी आणि सामान्य कुटुंबातील नात्यांशी जोडलेले असतील. भावंडांमधील नात्यातील छोटे रुसवे-फुगवे असोत किंवा मोठ्या संकटाच्या वेळी मिळणारी साथ, हे सगळं प्रेक्षकांना आपल्या आयुष्यातील नात्यांची आठवण करून देऊ शकतं.
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते रजत बेदी ‘बंधू’च्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीशी जोडले गेले आहेत. ते या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जे एस् डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेंमेंट यांच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’सारख्या चित्रपटांमधून आपली शैली दाखवलेले दिग्दर्शक नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी ‘बंधू’चं लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केलं आहे.
चित्रपटाच्या संगीताची आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी विजय नारायण गवंडे यांनी सांभाळली आहे. भावनिक प्रसंगांना अनुरूप संगीत आणि गाणी या सिनेमाच्या कथेला आणखी प्रभावी बनवतील, अशी अपेक्षा आहे.
दिग्दर्शकाने भावाभावाच्या नात्यातील प्रेम, संघर्ष आणि अहंकार यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही कथा केवळ पडद्यावरची गोष्ट न वाटता अनेकांना आपल्या कुटुंबातील नात्यांशी जोडणारी ठरू शकते.
‘बंधू’ हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांची जोडी भावांची भूमिका किती प्रभावीपणे साकारते आणि या नात्याचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना किती भावतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
