समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करणारी ‘कमळी’ मालिका आता शिक्षण व्यवस्थेतील वाढता व्यावसायिक दृष्टिकोन हा विषय मांडणार आहे. या कथानकात रितेश सरपोतदार हे पात्र महत्त्वाची भूमिका बजावणार असून, शिक्षण क्षेत्रातील काही वास्तवांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकरने झी मराठीवर पुन्हा काम करण्याचा आनंद व्यक्त केला. ‘कमळी’सारख्या लोकप्रिय मालिकेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल त्याने वाहिनी, निर्माते आणि प्रेक्षकांचे आभार मानले. तसेच, रितेश सरपोतदार हे पात्र अनेक छटा असलेले आणि आव्हानात्मक असल्याचे त्याने सांगितले.
शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विषय आपल्याला नेहमीच जवळचे वाटतात, असे सांगत शशांकने आजच्या परिस्थितीवरही भाष्य केले. त्याच्या मते, काही ठिकाणी शिक्षणाकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात आहे. अशा मानसिकतेत विद्यार्थ्यांची स्वप्ने, पालकांचे कष्ट आणि भावना यांना दुय्यम स्थान दिले जाते. रितेश सरपोतदार हे पात्र अशाच महत्त्वाकांक्षी आणि कठोर व्यक्तिमत्त्वाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे त्याने सांगितले.
मात्र, हे पात्र केवळ नकारात्मक नाही. तो असा का घडला, त्यामागची कारणे आणि त्याच्या स्वभावातील विविध पैलूही मालिकेतून उलगडणार असल्याचे शशांकने स्पष्ट केले.
आगामी भागांमध्ये कमळी तिच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि अभ्यासाच्या जोरावर रितेश सरपोतदार याला कसा सामना देते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेतील हा नवा संघर्ष प्रेक्षकांसाठी अधिक रंजक ठरण्याची शक्यता आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
